Crop Damage Compensation : पीक नुकसान भरपाईपोटी एक लाख शेतकऱ्यांना १३७ कोटीचे अनुदान

Crop Damage Compensation जिल्ह्यात एप्रिल व मे २०२४ मध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून २२६ कोटी ८७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती.

त्यापैकी १ लाख ६ हजार ५८७ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत १३७ कोटी ७७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ८९ कोटी नऊ लाखाच्या अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्याने ईकेवायसी पूर्ण झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करून हक्काची भरपाई पदरात पाडून घ्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. Crop Damage Compensation

नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या १ लाख ८३ हजार ६२३ शेतकऱ्यांपैकी १ लाख ५१ हजार ६५० शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे. अपलोड करण्यात आलेल्या माहितीपैकी आजअखेर १६ हजार ४६३ शेतकरी बांधवांचे ईकेवायसी होणे बाकी आहे.

त्यामुळे उपलब्ध झालेल्या एकूण २२६ कोटी ८७ लाख रुपयांपैकी वितरण झालेले १३७.७७ कोटी रुपये वगळता आणखी ८९.०९ कोटी रुपये वितरित होणे बाकी आहे. पात्र असलेल्या आणि अद्याप पोर्टलवर माहिती न भरलेल्या व ईकेवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी ती करून घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. Crop Damage Compensation

जिल्ह्यातील ५७ पैकी ३३ महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ महिन्यात अतिवृष्टी झाली होती. ज्याठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी-नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरलेले आहेत.

Leave a comment